सुत्रकृमीमुळे तोट्यात गेलेल्या डाळींबा बागेस प्रत्येक झाडास १०० फळे !

श्री. सुदाम धोंडू ब्राह्मणकर,
मु. पो. जायखेडा, ता. सटाणा , जि. नाशिक.
मो. ९२२५७३८६०२



माझी १२ - १३ वर्षाची भगवा डाळींब बाग आहे. लागवड १०' x १५' वर आहे. या बागेच बहार धरण्यासाठी जानेवारी - फेब्रुवारी ताण दुऊन फेब्रुवारी अखेरीस खत देऊन पाणी दिले. मात्र छाटणीनंतर माल अजिबात लागला नाही. पत्री सुद्धा आली नाही. बाग तोट्यात चालली होती. झाडे मर रोगामुळे उपटून टाकायच्या विचारात होतो.

त्याचवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. संतोष ढगे भेटले. बाग तोडू न देता त्यांनी बागेची पाहणी करून मुळ्या उकरून पाहिले. तेव्हा सुत्रकृमिचा प्रादुर्भाव झाल्याचे जाणवले म्हणून ३ x १॥ x १ फुटाचे चर घेण्यास सांगून सुत्रकृमींच्या मुळ्या तोडून चरात निंबोळी पेंड १ किलो, कल्पतरू खत ५०० ग्रॅम आणि १० :२६ :२६ व ट्रायकोडर्मा टाकण्यास तसेच झाडाच्या बुंध्यापासून ३ फुटावर ड्रीपर लांबविण्यास सांगितले.

त्याप्रमाणे कामे करून जर्मिनेटर मुळावाटे सोडले. तेव्हा विचार असा होता की ४ महिन्यांनी बहार धरावा. मात्र जर्मिनेटर २ महिन्यातच माल लागला. नंतर गाठ सेटिंग झाल्यावर थ्राईवर आणि क्रॉंपशाईनर १५ दिवसांच्या अंतराने फवारले, तर उपटायला निघालेल्या या झाडांना १०० - १०० फळे लागली. एकूण १००० झाडे आहेत. हा माल ऑगस्टमध्ये एक्सप्रोर्ट होईल. आज (६ जून २००८) फळे बारीक संत्र्याएवढी १५० ते २०० ग्रॅमची आहेत.

तेव्हा सरांनी सांगितले की, थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १॥ लि., राइपनर ५०० मिली आणि न्युट्राटोन ७५० मिलीची १५ जूनपर्यंत एक फवारणी करावी आणि हाच डोस पुन्हा १५ दिवसांनी फवारावा. म्हणजे फळे ४५० ते ५०० ग्रॅमची सहज मिळतील.