मृतावस्थेतील डाळींब बागेच पुनर्जीवन, दर्जेदार फळे आणि अधिक दर

श्री. सदाशिव चंद्रकांत टेकवडे (श्री. रविंद्र माणिक पवार),
मु. पो. जवळाअर्जुन, ता. पुरंदर, जि.पुणे,
मो. ९८२०६२७००४, ९९२१४०१४३४



भगवा डाळींबाची रोपे सांगोल्याहून आणून १ एकर मुरमाड जमिनीत जुलै २००५ मध्ये १०' x १३' वर लावली होती. मात्र पावसाच्या अनियमितपणाने आणि ड्रीप असूनही पॉवर सल्फायर बंद पडल्याने पाने गळून फांद्या वाळल्या. (संदर्भ - कृषी विज्ञान, सप्टेंबर २००८, काव्हरवरील फोटो क्र. १ पहा) एक ते दीड महिन्याने त्या रोपांना कॅनॉलचे पाणी पाटाने देऊन सरांच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी २५ मिली १० लि. पाण्यातून रोपांवरून ड्रेंचिंग केले, तर मृतावस्थेतील रोपे फुटू लागली. त्यांना २- ३ फांद्या निघून आशेचा किरण दिसला. (सप्टेंबर २००८, कव्हरवरील फोटो क्र. २ पहा) त्यानंतर आठवड्यातून २ वेळा वापर याचप्रमाणे केला असता, रोपांचे फुटवे जोमाने वाढू लागले. पांढर्‍या मुळीचा जारवा वाढला. तर्‍हेने मृतावस्थेतील ७० - ८० % रोपे जगली. (सप्टेंबर २००८, कव्हरवरील फोटो क्र. ३ पहा ) गेलेल्या रोपांच्या जागी नंतर नवीन रोपांची लागवड करून त्यांनाही वरीलप्रमाणेच तंत्रज्ञान वापरले. रोपांमधील वाढ, फुट समाधानकारक वाटल्याने पुढे डॉ.बावसकर सरांच्या सल्ल्यानुसार नियमित वापर केला. २ वर्षात झाडांची जोमदार वाढ झाली. त्यामुळे पहिला बहार धरला.

नोव्हेंबर महिन्यात बागेस ताण देऊन छाटणी करून कल्पतरू खत १ किलो, निंबोळी पेंड १ किलो, गांडूळ खत १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम, शेणखत १ घमेले आणि मळी १ घमेले असा डोस देऊन चटणी छाटणी करून १५ डिसेंबर २००७ ला पहिले पाणी दिले.

फुटीसाठी लगेच जर्मिनेटर, थ्राईवर आणि प्रिझम ५०० मिलीची २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्याने फुट व्यवस्थित निघून पानांना चकाकी व रुंदी वाढली. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ७५० मिली आणि क्लोरोपायरीफॉस ३५० ते ४०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्याने, फुलकळी निघू लागली. पुन्हा तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर , प्रोटेक्टंटची फवारणी चालू होती. फळांचे सेंटिंग चांगले होऊन रोग - कीड पुर्णता आटोक्यात होता. परिसरातील बागा रोग - कीड ग्रस्त होत्या. कळी कमी- अधिक प्रमाणात लागली होती. आम्ही नियमित बागेची पाहणी करून त्याचे फोटो सरांना दाखवून वेळोवेळी सल्ल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करीत होतो.

फेबुवारी अखेरीस फळे लिंबाएवढी झाली, तेव्हा शेण १० किलो + लिंबाचा पाला १० किलो + गुळ १ किलो + बेसनपीठ १ किलो + करंजाचा पाला १० किलो + सिताफळ पाला १० किलो २१ दिवस २०० लि. पाण्यामध्ये रापविले व नंतर ते मुळशी १ - १ लिटर सोडले.

वरील मिश्रण प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये जमिनीत पुरलेले असेल तर १५ दिवसात रापते आणि शेणखतामध्ये जर पुरले तर ७ व्या दिवशी खत वापरण्यास उपलब्ध होते.

फळे संत्र्याच्या आकाराची झाल्यावर (संदर्भ - पान नं. ३३ वरील फोटो) मार्चमध्ये थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंटच्या दर आठवड्याला मे अखेरपर्यंत फवारण्या घेत होतो. तसेच मे महिन्यात ०:०: ५० ५ किलो + PSB जिवाणूखत ५०० ग्रॅमचे ड्रीपमधून ३ डोस आठवड्याला सोडले. जूनमध्ये पहिल्या आठवड्यात ३०० ते ४०० ग्रॅमची फळे असताना पोटॅश प्रत्येक झाडास २५० ग्रॅम गाडून दिले आणि पूस पडण्यापुर्वी क्लोरोपायरीफॉसची फवारणी केली. फळे काढण्यापुर्वी आठ दिवस थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, व न्युट्राटोनची फवारणी केली.

१५ जूनला तोडा चालू केला. झाडावर ४० ते ५० फळे होती. ५०० ते ६५० ग्रॅमची फळे झाली. पहिले २ तोडे आठवड्याला केले. पहिल्या तोड्याला ६ नगाचे ११५ बॉक्स, ८ नगाचे १३५ बॉक्स आणि ९ व १२ नगाचे १०० असे एकूण ३५० बॉक्स निघाले. दुसर्‍या तोड्याला २०० बॉक्स निघाले, ते ८ आणि १२ नगाचे होते. तिसर्‍या तोड्याचा १५ क्रेट माल पुण्यामध्ये काल (२६ / ०७ / ०८ ) रोजी आणला होता.

पहिल्या दोन तोड्याचा माल मुंबई मार्केटला विकला. सरांच्या तंत्रज्ञानाचा नियमित वापर केल्याने फळांचा आकार वाढून वजन, गोडी अधिक मिळाली. तसेच सालीला आकर्षक चमक आल्याने मालाला उठाव मिळाला. ६ नगाच्या बॉक्सला २२० रू.) ८ नगाच्या बॉक्सला १८० आणि १२ नगाला १६० रू. भाव मिळाला.

तिसर्‍या शेवटच्या तोड्याच्या मालाला ३० रू. किलो भाव पुणे मार्केटला मिळाला.

बहार घरल्यापासून औषधे खतांचा खर्च २५ हजार रू. झाला. पहिली पट्टी ६० हजार रू., दुसरी २० हजार रू. आणि तिसरी (शेवटची) १० हजार रू. असे ९० हजार रू. पहिल्या बहराचे झाले.

अजून १७०० - १८०० बारीक फळे (१०० ते १५० ग्रॅमची) मागे आहे. ती दिवाळीत काढणीस येतील. त्यासाठीही सरांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञानाच वापर करणार आहे. हा माल उतरवून बाग ताणावर सोडून पुढील बहार पुन्हा डिसेंबरमध्ये धरणार आहे.