सोयाबीन २१ व्या शतकाचे सुवर्ण पीक!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


स्वातंत्र्यापुर्वीच्या काळामध्ये भारताला भात हे दक्षिण भारतातून आणि गहू हे उत्तर भारतातून तर उर्वरित भारतातून ज्वारी, बाजरी ही तृणधान्य, मर्यादित डाळी, तेलबिया ह्या आपल्या अन्नघटकाचे उत्पादन होत होते. एकूण लागणाऱ्या निम्म्याहून अधिक कडधान्य, तेलबिया आयात करावे लागत होते. १९४० ते ५० पर्यंतच्या काळात पाऊसमान योग्यवेळी, विस्तृत आणि विभागून होत असल्याने तेव्हा भुईमूगाचे पीक व्यवस्थित येऊन ते गरीबांचे तेलपीक होते. त्याकाळी शेंगदाणा ३ आणे शेर आणि शेंगदाणा तेल ५ आणे शेर भावाने मिळत असल्याने सर्वसाधारण ग्राहकांना व शेतकऱ्यांनाही परवडत असे.

पर्जन्यमान कमी व दुष्काळसदृष्ट परिस्थितीमुळे भुईमूगाचे क्षेत्र अचानक कमी झाले

१९६५ मध्ये हायब्रीडच्या क्रांतीनंतर गहू, ज्वारी, बाजरी, भात या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. मात्र आजही जागतिक उत्पादनापेक्षा आपल्या देशात उत्पादकता फार कमी आहे. १९७० च्या दशकानंतर पाऊस कमी झाल्याने भुईमूगाची लागवड झपाटयाने कमी झाली. १९७२ च्या दुष्काळानंतर तर शेतकरी, प्रशासक, नेते अडचणीत आले. त्याकाळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याने त्यांनी त्यावर बऱ्यापैकी उपाययोजना केली. लोकसंख्या एका बाजूला वाढत राहिली आणि उत्पादनात मात्र घट येऊ लागली. पावसाचे प्रमाण व पावसाच्या कालावधीतील घट आणि प्रत्येकवेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण तुरळक आणि आषाढ महिन्यातील त्याचे बरसण्याचे प्रमाण जवळ - जवळ नगण्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशी अवस्था सर्व भारतात होती. येथील सर्वसाधारण कोरडवाहू भागाचे पर्जन्यमान १० इंचापासून १५ इंचाच्यापुढे सरकले नाही. म्हणून भुईमूग, करडई यांचे क्षेत्र झपाट्याने कमी म्हणून २५ टक्क्यावर आले. मध्येच सुर्यफूल हे तेल पीक डोकाऊ लागले. त्याचे उत्पादन काही काळ बऱ्यापैकी झाले, मात्र जसे पाऊसमान कमी झाले तसे सुर्यफूलाचेही उत्पादन घटले. उत्तरेकडील राज्य बऱ्यापैकी पाऊसमान, पूर परिस्थिती असल्याने तेथीलही तेलबियाचे उत्पादन बाळसे धरू शकले नाही. तेलाची मागणी वाढल्याने एकूण मध्यम वर्गाच्या खाण्याच्या सवयी, बी.पी.एल. (दारिद्र्य रेषेखालील) लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्याने तेलाचा वापर झपाट्याने वाढला. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने गरिबांचे भुइमूगाचे तेल श्रीमंतांचे तेल झाले. पण त्याच्या खाण्याने कोलेस्टेरॉल वाढत असल्याने श्रीमंत लोक ते खाईनसे झाले. त्यांचा कल करडई , सूर्यफुल व तीळ तेलाकडे वळला. ५ आणे शेर मिळणारे भुईमूग तेल १४० रू. लिटर झाले. अशा अभूतपुर्व परिस्थितीमध्ये सणासुदीच्या काळात पामतेल हे मलेशिया, व्हियतनाम येथून मोठ्या प्रमाणात आयात करून २० रू. किलोने रेशनवर मिळू लागले. तूर, उडीद, मूग, मटकी, मसूर डाळींचेही उत्पादन पाऊसमान घटल्याने कमी झाले. त्यामुळे त्याची आयात विविध देशातून करावी लागली.

या सर्व परिस्थितीमध्ये सोयाबीन या पिकाचा उदय अमेरिका खंडामध्ये ५० च्या दशकात झाला आणि ६० ते ७० या दशकात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६५ च्या काळात हे पिक भारताला तसे नवीनच होते. ७१ - ७२ च्या काळात याची लागवड देशात होऊ लागली. त्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होऊन २५ हजार टन उत्पादन झाले. म्हणजे हेक्टरी उत्पादन फक्त ८१९ किलो होते. एकूण पिकाच्या लागवडीमध्ये याचे क्षेत्र ०.१८% होते. १९७६ साली या पिकाच्या लागवडीने उचल खाल्ली. २४३ हजार हेक्टर क्षेत्र होऊन उत्पादन १९६ हजार तन झाले. म्हणजे क्षेत्र वाढले मात्र उतारा घसरला. ८०५ किलो/ हेक्टर उत्पादन झाले. त्यानंतर १९८० - ८५ मध्ये ७८६ हजार हेक्टर क्षेत्र होऊन उत्पादन ५९४ हजार टन व हेक्टरी उतारा ७५५ किलो मिळाला. १९८५ -९० या काळात १६८० हजार हेक्टर क्षेत्र तर १२ लाख ३३ हजार टन उत्पादन झाले. सरसरी उत्पादन घसरले. अशा रितीने २००१ - २००५ मध्ये ६६ लाख १६ हजार हेक्टर एकूण क्षेत्र सोयाबीन खाली आले असून ६२ लाख ५४ हजार टन उत्पादन मिळाले. म्हणजे सरासरी उत्पादन ९४५ किलो/हेक्टरी मिळाले. हल्लीच्या सोयाबीनची उपयुक्तता लक्षात येऊ लागली तशी मध्यप्रदेश मध्ये ४० लाख हेक्टर तर महाराष्ट्रात १६ लाख हेक्टर व राजस्थानात ५ लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्र झाले. म्हणजे भारतातील एकूण सोयाबीनचे उत्पादनापैकी ९६ टक्के क्षेत्र हे या तीन राज्यातच आहे.

सोयाबीनमधील क्षेत्रातील वाढ झाल्यावर सोयाबीनचे राष्ट्रीय संशोधन केंद्र इंदोर येथे स्थापन केले. देशांतर्गत मागणी, निर्यात, सोयाबीन तेल, पावडर, ऑईल मिल, प्रथिने, पेंड यांची उपयुक्तता वाढल्यामुळे मध्यप्रदेश व विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये याच्या पुरक उद्योगांची उभारणी झपाट्याने झाली. भुईमूगाला पावसाचे प्रमाण ज्यादा लागत असून आरे लागताना व शेंगा पोसताना जमिनीत ओलावा बऱ्यापैकी आवश्यक असतो. नेमके याच काळात (ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये) पाऊस कमी झाल्याने पुरेश ओलाव्याअभावी भुईमूगाच्या उत्पादनात घट येते. त्याजागी सोयाबीन हे पीक कमी पाण्यावर एकरी ८ ते १२ क्विंटल उतारा देते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सांगली तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात एकरी १८ क्विंटलचा उतारा ११० दिवसात पार केला आहे. सोयाबीन या पिकाला एक जरी पाण्याची पाळी मिळाली तरी याचे तेलाचे, प्रथिनांचे प्रमाण चांगले राहू लागले. सोयाबीन तेलात लिनोलिक अॅसिड C17, H31, COOH आणि लिनोलिनीक C15,H29,COOH यामुळे हे तेल हृदय विकार व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. त्यामुळे आहारात आणि प्रक्रिया उद्योगात या तेलाची मागणी देशभर मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे सोयाबीनचे एकरी उत्पादन १५ ते २० क्विंटलपर्यंत येऊ लागल्याने खारीपातच नव्हे तर रब्बी सोयाबीनसुद्धा शेतकरी घेऊ लागले. अशा रितीने भुईमूगाखालील क्षेत्र कमी होऊन ते सोयाबीन ने घेतले. विशेष म्हणजे सोयाबीन हे १०० दिवसांचे पीक असून याचा दर २८०० रुपयापासून ३५०० रू./ क्विंटल मिळत असल्याने त्याचे एकरी १५ क्विंटल जरी उत्पादन मिळाले तरी ४५ ते ५० हजार रू. उत्पादन एका हंगामात मिळते. तेव्हा भारत सरकारने व राज्य सरकारने हे पीक देशाचे सुवर्ण पीक (Golden Coin) घोषीत करून याला विम्याचे संरक्षण द्यावे. हे द्विदल शेंगवर्गीय (Leguminous ) पीक असल्याने याला खताची गरज कमी लागते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मुळांवर नत्राच्या गाठी भरपूर वाढून नत्र स्थिरीकरणाचे कार्य झपाट्याने होते. त्यामुळे जमिनीची भौतिक व जैविक सुपिकता आणि जमिनीचे आरोग्य वाढते. तसेच याचा बेवड उत्तम असून (फेरपालट) नंतरच्या कांदा, बटाटा, भाजीपिके, फळपिके यांना फार उपयुक्त ठरतो. हे पीक नुसत्या भारतालाच नव्हे तर जगातील १०० हून अधिक राष्ट्रांतील बालकांचे व मोठी जनसंख्य स्त्री, पुरुष व तरुणांचे कुपोषण थांबवणारे असल्याने अनेक देशांनी हे पीक घेणे गरजेचे आहे.

या पिकाच्या बाबतीत मात्र अलिकडे काही समस्या निर्माण झाल्या. त्यामध्ये सोयाबीन पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होणे, पानझड होणे, पाऊसमान कमी - अधिक झाल्यावर वितभर पीक आल्यावर लष्करी अळी, उंट अळीचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पोसण्याच्या काळात उंट अळी पीक फस्त करते. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृताचा वापर केला गेला तर रोगकिडींवर प्रतिबंध होऊन १५ ते १८ क्विंटल उत्पादन एकरी मिळते. तसेच दुष्काळात जनावरांना चारा महणून याच्या भुसा दुधाच्या व जड काम करणाऱ्या जनावरांसाठी वरदान ठरतो. तेव्हा या चाऱ्याचे किंवा सोयाबीन काढल्यावर टरफलाचे कंपोस्ट अथवा गांडूळखत न करता देशातील व परदेशातील गरजा लक्षात घेऊन जनावरांना, कोंबड्यांना, शेळी, मेंढी, डुक्कर, ससे पालन अशा अनेक उपयुक्त उधोगांना हे पीक, क्रांतीकरी ठरेल. या पिकाचा भुसा हे तिसऱ्या जगातील लोकांची भूक मिटवेल. मका हे पीक भारताला आणि जगातील अनेक राष्ट्रांना जमिनीच्या व देशाच्या दृष्टीने हानिकारक आहे. याने अर्थव्यवस्था ही जरी सावरणारी असली तरी सुधारणारी नक्कीच नाही.

आजच्या घडीला अनेक कोरडवाहू पिकांमध्ये कापसापेक्षा सोयाबीन हे काकणभर सरसच आहे. देशाची अर्थव्यवस्था, कुपोषण कमी होऊन आरोग्य सुधारणा, अन्न सुरक्षा यामध्ये सोयाबीनचे महत्व वाढले आहे. गर्भवतीचे कुपोषण, बालकुपोषण याला आळा बसेल, यामध्ये तेलाचे प्रमाण, जीवनसत्त्वे, कर्बोदके, प्रथिने, स्निग्धांश, अॅमिनोअॅसिडचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असल्याने कमी वजनात अधिक फायदे देणारे म्हणजे टक्केवारीमध्ये या पिकाचे पोषणमुल्य, पक्रियाउद्योग, औषधउद्योग, अन्नधान्य व इतर तत्सम मुल्यवर्धीत देशाची आर्थिक व्यवस्था सावरणारे हे जगाचे २१ व्या शतकातील सुवर्ण पीक (Golden Coin) होय.