शेती मालाचे भाव कशावरून ठरतात ?

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेतमालाचे भाव ठरविणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. पारंपारिकतेने असे म्हणता येईल की, जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो तेव्हा मालाचे भाव वाढतात आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की, भाव कोसळतात. या दोन्ही प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याची अवस्था ही ऊस गुऱ्हाळातील चरख्यातील चोयट्यासारखी होते.

आता आपण शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात या विषयी पाहूया. प्रथम आपण तृणधान्य या पिकांचे बाजारभाव ठरविताना दृढ व प्रचलित असणारी मानांकने या विषयी पाहूया - तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, मका या पिकांचा समावेश होतो.

१) ज्वारी - या पिकाची मानांकने पहायची झाल्यास ज्वारी ही टपोरी, गोल, मोत्यासारखी चमकदार असावी. त्यामध्ये कीड, बोंड, बारीक लांबोळकी नसावी. यामध्ये धनोर (सोनकिडे) नसावे. ती स्वच्छ चाळलेली असावी. बोंडे रोळून किंवा वाऱ्यावर पाखडून काढलेली असावी. अशाप्रकारचे धान्याला १ नंबर भाव मिळतो. गेल्या ५० वर्षापुर्वी ज्वारीचे भाव १.५ ते २ रू. किलो होते. जसजसे महागाई व उत्पन्नाचे श्रोत वाढत गेले. तसे भाव वाढत गेले. काही काळानंतर व्यापारी पिकांचे क्षेत्र वाढल्यावर खरीप ज्वारी खालील क्षेत्र घटले आणि खरीपातील गावरान ज्वारीचे उत्पन्नापेक्षा हायब्रीड ज्वारीचे उत्पन्न जास्त येते. त्या नादाखाली हायब्रीड ज्वारीखालील क्षेत्र वाढू लागले. पावसाचे मान व निविष्ठांचा वापर कमी झाल्याने या ज्वारीच्या उत्पन्नाचा दर्जा घसरला त्यामुळे ज्वारीचा भाव घसरला. खरीपातील ओलावा सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये कमी होऊन दादरचे उत्पादन कमी झाले आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने दादरचे भाव वधारू लागले तसे गरीबाची ज्वारीची कांदा - भाकरी ही श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसली. आम आदमी भाकरीच्या चंद्राला पारखा झाला, कारण जेव्हा कांदा ३० रू. ते ४० रू. झाला तेव्हा जवारी २५ ते २८ -३० रू. झाली. खर्च आणि उत्पन्न याचा पडताळा सुटत नाही म्हणून आणि पाण्याचे श्रोत वाढल्याने ज्वारी खालील क्षेत्र व्यापारी फळपिकांखाली येवू लागले. त्यामुळे ज्वारी ही गरीबाची मीठ- भाकरी न राहता श्रीमंतांची पिठलं - भाकरी झाली आणि एरवी हमाल पंचायतमध्ये १ ते २ रुपयाला मिळणारी झुणका - भाकरी ही प्रेक्षणीय ठिकाणी छोटेखानी हॉटेल, ढाबे (रिसॉर्ट) मध्ये पिठलं - भाकरी ही ७० रू. आस मानाचा भाव घेवू लागली.

२) बाजरी - बाजरी ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जसे नगर, पुणे, धुळे, नाशिक, सातारा, सांगली या परिसरामध्ये हे कमी देखभालीवर अवध्य ३ पावसावर ४५ ते ६० दिवसात येणारे अल्प ते मध्यम भूधारकाचे हुकमी पीक होय. देशी जाती कमी उत्पन्न देणाऱ्या पण चवदार असल्याने जी पाचूसारखी हिरवी, चमकदार, ठोकळ अशी अरगट रोगविरहीत असते. तिला ५० वर्षापुर्वी ३ ते ४ रू. किलो भाव असे. नंतर कालांतराने या खालील क्षेत्र कमी झाल्यावर तिची मागणी वाढली. याला कारण पाऊसमान अनिश्चित व कमी प्रमाणात म्हणजे जुनचा पाऊस जुलै अखेर होऊ लागल्याने हे पीक पिकणाऱ्या जिल्ह्यातून गायब झाले. कारण ४० दिवस पाऊस पुढे गेल्याने ४५- ६० दिवसाचे पीक श्रावणात येणारे आणि भाद्रपदात मळणी व सरमाडाच्या कुपी लागत ती या परिस्थितीने कल्पकथा झाली आणि ज्या त्रोटक क्षेत्रामध्ये पावसाने आपली मेहर नजर वळवली तेथे पावसाचे ३ - ४ शिडकाव होऊन बाजरी येऊन बाजरीचे भाव २४ रू. पासून ३० रू. पर्यंत असे गगणास भिडले. यामध्ये जशी पावसाळी बाजरी आहे तशी उत्पन्नाच्या दृष्टीने संकरीत वाणांचे कणीस मोठे, दाणा ढोबळ, खरीपापेक्षा उन्हाळी बाजरीचे उत्पन्न जास्त येत असल्याने ज्या भागात शेतकरी सर्वसाधारण कष्टाळू, सजग राहिला अशा ठिकाणी उन्हाळी बाजरी ४५ - ६० दिवसात निघू लागली. याला देखील चांगले दिवस येऊ लागले मात्र नेहमीप्रमाणे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊ लागला. बाजरी खाणाऱ्यांची कुचंबना होऊ लागली. बाजरीची भाकरी आणि कालवण, बाजरीची भाकरी आणि भरीत, बाजरीची भाकरी आणि रसपाट , बाजरीची भाकरी आणि मटण, बाजरीची भाकरी आणि मासवड्या असे विविध पर्याय याला आम आदमी मुकला. कारण मार्केटमध्ये बाजरी दिसेनाशी झाली आणी त्याची जागा गव्हाने घेतली.

३) गहू - गव्हाच्या बाबतीमध्ये गहू हे पीक काळ्या कसदार, ज्याच्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण ४० ते ६०% आहे आणि पाणीधारणक्षमता (W. H. C.) ६० ते ७५% आहे. अशाठिकाणी रब्बीमध्ये नुसत्या थंडीवर गहू येतो. परंतु गेल्या ४ - ५ किंवा १० वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणभरती (बागायती) गहू करतात. हे करत असताना २१ दिवसांनी पहिले पाणी दिले गेले पाहिजे. पुढे नियमित २१ दिवसाच्या अंतराने म्हणजे ४२,६३,८४,१०५ व्या दिवशी असे पाणी दिले गेले पाहिजे. म्हणजे गव्हाचे उत्पन्न नियमित खतांची मात्र व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरासरी १५ ते २० क्विंटल येते. गहू हा एकेकाळी निफाड -५९ जिरायती आणि निफाड -१४३ हा बागायती होता. दोन्ही गहू चमकदार असून गव्हाची चपाती चविष्ट, नरम, कमी कोंडा निघणारा, पिवळ धमक, दाणे टपोरे, मधे फुगलेले, दोन्ही बाजूस निमुळते अशा प्रकारचा गहू पौष्टिक समजला जातो आणि यापासून सोजी (रवा), आटा -मैदा (बारीक पीठ) करतात. यापासून जेव्हा मूल्यवर्धीत प्रक्रिया पदार्थ बनविले जातात तेव्हा वस्तुचा भाव थोडा २ पैसे जादा असला तरी मूल्यवर्धीत वस्तुचा दर्जा वाढल्याने या गव्हास भाव जादा मिळतो.

४) भात - भातामध्ये हल्लीच्या मध्यम - मध्यम, मध्यम - श्रीमंत ते श्रीमंत - श्रीमंत अशा उच्चभ्रू (white Collar) लोकांमध्ये भात हा सुगंधी, सुटा होणारा, थोडासा तूपकट अशा तांदळाला देशात - परदेशात व विशेषेकरून महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. अशा ह्या मावळातील (पुणे) आंबे मोहोर तांदळाची जागा एम. पी. तील आंबेमोहोर घेऊ लागला. १४ आणे किलो ३ मे १९६९ रोजी मिळणारा आंबेमोहोर तांदूळ आज ४१ रू. किलोची मर्यादा ओलांडून एम.पी.तील तांदळाचा भाव ६७ - ७० रू. किलो झाला आहे. येथे त्याचा अर्थ तोच झाला की याचे उत्पन्न घटले व मागणी वाढली. एकेकाळचा बासमती. (दिल्ली राईस) हा अतिच्चभ्रू समाजाचा समजला जाणारा तांदूळ ७० च्या दशकात ३० रू. किलो होता आणि आंबे मोहोर २० रू. किलो होता. तो आज विविध ब्रँड खाली ५० रू. पासून १५० ते १८० रू. किलोपर्यंत विकला जातो आहे. पण या भाताचा दाणा लांब असल्याने याचे शीत शिजवल्यानंतर अर्धा ते पाऊण इंच होते. याची चव मात्र कमी असली तरी याची बिर्याणी किंवा पुलाव चांगला होतो. यानंतर काश्मिर आणि हिमाचलप्रदेशचा भात हा उच्च प्रतीचा असून याचा १८०रू. किलो दर असतो. मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे पुलाव बनवून खाल्ला तर पोटात गॅसेस होतात. भात हा सुगंधी आहे हे ओळखायचे कसे? एक चमचाभर तांदूळ तळहातावर घेवून त्यावर २ थेंब पाणी टाकून चोळावा व वास घ्यावा. त्याला सुगंध आल की तो सुगंधी आहे असे समजावे. या ताज्या तांदळाला शिजताना पाणी कमी लागते परंतु सुगंधी तांदूळ हा ताजा चांगला लागतो. तो जरा गिजगा (गोळा) होतो. परंतु चवीला चांगला असतो. तो जर तांदूळ ४ महिन्याचा जुना झाल्यावर केला तर त्याला पाणी जास्त लागून तो फुलतो व सुटा होतो. त्यामुळे तो कुटुंबाला कमी लागतो. सुगंधी तांदूळ हा गरवा असतो. हळवा तांदूळ हा गरीब व मध्यम वर्ग मसाला भात किंवा सध्या फोडणीच्या खिचडीला वापरतात. याचा दर १५ ते २० रू. किलो असतो. १ उकड्या प्रकारचा तांदूळ असतो. तो आंध्रप्रदेशमध्ये २ रू. किलो मिळतो. याला उकळल्यानंतर त्याची पेज सर्व कुटुंबातील लोक पितात ती फार पौष्टिक असते. नंतर तो परत शिजवून सांबाराबरोबर आंध्र व तमिळनाडूतील लोक खातात. जास्त करून फटाक्याच्या कारखान्यातील मजूर, काडीपेटीच्या कारखान्यातील आणि विडी कारखान्यातील बालमजूर, स्त्रिया, पुरूष हे असा तांदूळ खातात. तसेच आंध्रातील उन्हाळ्यात विहीर खोदणारे लोक १०० किलोचे पोते ४० लोकांची टोळी २ दिवसात संपवते. आता हाच तांदूळ अन्न सुरक्षेच्या नावाखाली २ ते ३ रू. किलोने गरीब लोकांना द्यायचे नाटक सरकारने चालू केले आहे. ही योजना कितपत यशस्वी होते हे प्रश्नचिन्हच आहे? यामुळे शेतमजूर दुरापास्त होईल असे शंकेचे ढग येऊ लागलेले आहेत.

५) मका - मका हे गेल्या ५ वर्षामध्ये जवारी व कडधान्याची लागवड कमी होऊन ३ महिन्यात पैसे देणारे पीक म्हणून प्रचलित होऊ लागले आहे. याचे कारण या पिकाचा वापर कारखानदारीमध्ये पशुखाद्य, कोंबडीखाद्य यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. परदेशात कॉर्न एक्सप्रेस सिरप (Corn Express Syrup) या करीता मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे ११० दिवसात हे पीक येते. हे सिरप साखरेपेक्षा गोड असते आणि उसाला जादा वेळ लागतो म्हणून परदेशात उसाच्या जागी मक्याचा वापर केला जातो. म्हणून राजकारणण्यांनी आणि जागतिक बँकांनी ऊस कारखानदारी हे एकेकाळी सहकारातील वरदान ठरत होते ते खाजगीकरणाने राजकारणी लोकांनी उत्यंत कमी किमतीत विकत घेऊन सहकार मोडीत काढण्याचा सपाटा लावला आहे. 'सरसोका सार और मके की रोटी' हे एक समीकरण जरी असले तरी जमिनीचा पोत आणि सुपिकता कमी करण्याचे काम (पाप) मका करीत असल्याने आम्ही एक संपादकीय लिहीले होते की, मक्यापासून १२० दिवसात पैसे मिळत असले आणि परदेशात निर्यात होत असल्याने ३ रू. किलोचा मका आज १६ रू. किलोने जात आहे. त्याची शेतकऱ्याला भुरळ पडली आहे. म्हणून 'पैका देतो मका म्हणून सतत लावू नका' ही एक क्विनॉइनची गोळी समजावी. पुढे चालू (कडधान्य) …