खरीप गेला तरी रब्बी व उन्हाळी हंगाम तारेल !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


यंदाचे वर्षे २०१७ - १८ चा हंगाम हा वैविध्यपुर्ण पाऊसामानाच्या पडझडीचा व कमी - जास्त उघडीपीचा गेला. सुरुवातीच्या काळामध्ये विदर्भ, मराठवाडा विशेषता अकोला, बीड, उस्मानाबादचा भाग श्रावणी पोळ्यापर्यंत कोरडा गेला. परंतु उर्वरीत पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे याठिकाणी पाऊस हा बऱ्यापैकी व वेळेवर पडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोकणातील सुरुवातीचे खरीप भात लागवडीच्या वेळी पाऊस पडला त्याने भात पीक चांगले आले परंतु पालघर जिल्ह्यात भात काढणीच्या वेळेस जो पाऊस पडला त्याने कापलेले भात कापलेल्या अवस्थेत जागीच उगवण झाल्याने सारे भात वाया गेले. अशा प्रकारे नुसत्या पालघर जिल्ह्यात ७६ हजार एकर भात पुर्ण वाया गेले. देशातील उत्तरेकडील अर्ध्या भारतातील खरीप हंगाम हा अति पावसाने जवळ जवळ नामशेष झाला आहे. काही भागातील तुरळक भाग राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचा पुर्व व काही भाग याठिकाणी पाऊसमान कमी असते. पुर्ण उत्तर भारतापर्यंत म्हणजे राजस्थानच्या सिमेपासून ते थेट बिहार - बंगालच्या सिमेपर्यंत पावसाचे थैमान हे विद्द्ध्वंसक असते. ईशान्य भारतातील ६ ही राज्य येथे बाराही महिने पूर असतो. येथे पाऊसच इतका असतो की खरीप, रब्बी, उन्हाळी अशा मोसमांची वर्गवारीच करता येत नाही. येथील मुख्य पीक भात आहे. बिहार, बंगालमध्येही भात हेच मुख्य पीक असते. उत्तर भारतातील परिस्थिती ही भात पिकास अनुकूल होती. त्यामुळे येथील भाताचे उत्पादन यंदा वाढेल. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथेही पाऊसमान चांगले होते. तेथे धान पिके, सोयाबीन, कडधान्य यांचे उत्पादन बऱ्यापैकी यावे. पण तिच गोष्ट विदर्भाच्या पुर्वेकडील भाग येथे पावसाने ताण दिल्याने घान पिके, तेलबिया, कडधान्ये यांचे उत्पादन कमी प्रमाणात येईल. विदर्भाच्या काही भातात पावसाची सुरुवात उशीरा झाली. काही ठिकाणी वेळेवर पडला तेथे कमी प्रमाणात पडला. ज्यांनी कापसाच्या लागवडी केल्या त्यातील ज्यांना पाणी उपलब्ध होते तेथे संरक्षित पाणी देऊन कापसाचे पीक चांगले आले. पण बहुतांशी कापसाचे पीक म्हणावे तसे येणार नाही व रोगराईमुळे फरदड समाधानकारक घेता येणार नाही.

मा. वसंतराव नाईक हे मुखमंत्री असताना CSH -१, ५, ६ ह्या ज्वारीच्या संकरीत जाती घेतल्या जात असत. याचे उत्पन्न चांगले होते. या जाती कमी दिवसाच्या होत्या पण याचे पोषणमुल्य कमी होते. याचा चारही कमी दर्जाचा निकृष्ट असे. पण त्या अगोदर ऐसपुरी, दगडी, गुडघी, मालदांडी -३५ , सांगलीची शेणोली - ४ ह्या ज्वारीच्या जाती गावरान, टपोरे दाणे असलेले व भरपूर उत्पादन देणाऱ्या होत्या. ही ज्वारी खाण्यास अतिशय रुचकर, पचणारी होती. ह्या ज्वारीच्या जाती पावसाच्या थोडया पाण्यावर, मध्यम काळ्या ते भारी कसदार मगदुराच्या जमिनीवर रासायनिक खताची वाट न पाहणाऱ्या, किड, रोगास बळी न पडणाऱ्या, केवळ घराच्या शेणखतावर धान्याचे भरघोस उत्पादन तर देत होत्याच, शिवाय याचा कडवा ८ फुट उंचीचे ताट येऊन यामध्ये प्रत्येक पेऱ्याला खालपासून शेंड्यापर्यंत जाड, रूंद पानांचा, हिरवागार कसदार चारा दुभत्या व काम करणाऱ्या जनावरांना फार आवडत असे. या ज्वारीचे ताट (धांडा) जरी जाड असला तरी तो गोड असल्याने वाळल्यानंतर कामाची व दुभती जनावरे त्याकाळी कडबा कुटी मशीन नव्हती तरी कुऱ्हाडीने ९ ते १० इंचाचे तुकडे करून जनावरे आवडीने खात असत. याच्या १२ ते १५ - २० ताटांची पेंढी बांधली जात. ही पेंढी वनदार असे. ती एका जनावराला २ ते ३ वेळा पुरत. ही पेंढी संकरीत ज्वारीच्या ३ ते ४ पट असे. त्यामुळे ही ज्वारी त्याकाळी घरटी होत असे आणि त्यामुळे जनावरांना पोषक चारा मिळून पशुधन तंदुरुस्त राहत असे. दुष्काळाची छाया त्या काली सहसा नव्हती. हे वाण त्याकाळातील अनुकूल - प्रतिकूल हवामानाला पिके तरुन जात असत. हा या वाणाचा खास गुण होता. हीच गत जरीला व बोरीला कापसाची होती. ह्या देशी वाणांच्या जाती ह्या कमी खर्च व मध्यम उत्पादन आणि धोका जवळजवळ नाहीच अशा होत्या. त्याविरोधात पुढे आलेल्या संकरित व बीटी जाती ह्या जाहिरातबाजी व अधिक उत्पादन देतात या नावाखाली त्यांच्यावरील उत्पादन खर्च हा विशषेकरून किड - रोगाचा प्रभाव जास्त असल्याने त्यावर अधिक विषारी औषधे फवारून धोका निर्माण होऊन अजुनही म्हणावे तसे उत्पादन मिळत नाही. याचे कारण म्हणजे एकतर भारतातील हवामान हे या जातील ओळखू शकले नाही किंवा या जाती भारतातील हवामानाला कळल्या नाहीत आणि कदाचीत शोध लावणाऱ्यांनी ह्या जाती भारतातील हवामानाला कितपत रुजु शकतील हे प्रश्नचिन्ह आजही मनात तसेच आहे. म्हणून मोठे उत्पन्न येण्याच्या आशेवर शेतकरीवर्ग भरमसाठ खर्च करून किड - रोगाचा धोका त्याच्या जिवाशी जिवनमरणाचा खेळ खेळत आहे.

संकरीत वाणाच्या मागे लागल्यामुळे किंवा त्याचे आंधळ्यापणाने अनुकरण केल्याने शेतकरी कुंटुंबाची आर्थिक, मानसिक, सामाजिक व्यवस्था ही जवळजवळ जळवांनी रक्त प्यावे इतकी बिघडली आहे. ती गंभीर अवस्थेत असून समाजाची अवस्था ही अनाथासारखी झाली आहे. खरीपातील कडधान्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणाची, महाराष्ट्रापेक्षा वेगळी नाही. मागच्या वर्षी उडीद, मूग, सुर्यफुल, तूर, सोयाबीन याचे उत्पादन चांगले आले. त्यामानाने यावर्षी जुलै ते १९ ऑगस्टपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या वाया गेल्या. त्यामुळे अर्धा भाग कोरडा आणि १९ ऑगस्टपासून आलेला मोसमी पाऊस हा अजूनपर्यंत म्हणजे जवळजवळ १।। ते २ महिने कोसळतोच आहे. तेथे या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. उडीद, तुरीसारख्या काटक पिकास १९ ऑगस्टच्या पावसाने आधार दिला परंतु मूग, सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे त्याचे उत्पादनात वाढ होण्यापेक्षा तूटच संभवते. तसेच १९ ऑगस्टतरच्या सततच्या पावसाने तूर, उडीदाचेही उत्पादन चांगले येईल का? याबद्दल शंकाच आहे. अशा रितीने भारतातील सुरुवातीचा अर्धा खरीप हा पाऊस न आल्याने वाया गेला तर उरलेला खरीप अधिक पावसाने नामशेष झाला.

दुःखात सुख एवढेच आहे की, या पावसाने चाऱ्याचे उत्पादन भरपूर होऊन पशुधनाची परिस्थिती वर्षभर चांगली राहील आणि दुधाचे उत्पादन व प्रक्रिया पदार्थांचे उत्पादन वाढेल. तसेच दूध व दुधाचे पदार्थ कसदार होतील. छावण्या किंवा विकतचा चारा घेण्याचा प्रसंग शेतकऱ्यावर येणार नाही.

देशातील धरणे २ - ३ वेळा भरून त्याचा विसर्ग सोडण्यात आला. महाराष्ट्रातील १००% धरणे १००% भरली. उजनी, जायकवाडी ही धरणे जी बरीच वर्षे कधीच भरत नसत ती धरणे सुदैवाने पुर्ण भरली. ही अवस्था १५ ऑक्टोबरची आहे.

प्रत्यक्षात रब्बी हा कोरडवाहू भागात १५ सप्टेंबरपासून सुरू होतो व माध्यम काळ्या, भारी जमिनीत हा रब्बी थोडा उशीरा १ ते १५ ऑक्टोबरला जरी सुरू झाला तरी आस्मानीचा जसे अकाली पाऊस, पूर, गारांचा पाऊस, चक्री वादळे याचा तडाखा जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत बसला नाही तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, मोहरी, जवस, रब्बी बटाटा, कांदा, ज्वारी (दादर, शाळू), तुरीचा खोडवा ही पीके यशस्वी होतील. ज्या राज्यामध्ये धान, विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, गोंदिया येथे खरिपाचे धान गेले पण रब्बीचे काय होते ते कळेल. बिहार, महाराष्ट्रात बटाटा चांगला येऊ शकतो. ढगाळ वातावरणाने आणि प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर भुरी व डावणी तसेच डाळींबावर तेल्या रोगाची शक्यता वाढली आहे. तेव्हा आम्ही सुचविलेले डाळींबासाठी १४ x १४ फुट किंवा १५ x १५ फुट हेच अंतर ठेवावे. पुढील अवस्थेत द्राक्षावर घेतलेल्या फवारण्या, लिंबाचा हस्त बहार, डाळींबाचा आंबे बहार यास वातावरण अनुकूल आहे.

लिंबाच्या हस्तबहारासाठी ऑक्टोबरमध्ये कल्पतरू देऊन ज्यांनी जर्मिनेटर व कॉपर-ऑक्सीक्लोराईडचे आळवणी केले त्यांचे लिंबास फुलकळी निघण्यास अनुकूल आहे. फुल लागल्यानंतर जर हस्ताचा विजांच्या कडकडाटांचा पाऊस झाला तर फुलगळ व गुंडीगळ होते. त्यामुळे उन्हाळी बहार येत नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाच्या वर्षी संत्रा, मोसंबीचा आंबिया बहार चांगला घेता येईल.

यंदाचा खरीप हा ७० ते ८० % जरी गेला तरी खरिपाचे भाव व्यापाऱ्यांनी पाडू नयेत व अधिक तेजीची करू नये. म्हणजे टोमॅटोसारखीही स्थिती करू नये. कारण टोमॅटो हा कांद्याच्या रांगेत जाऊन बसेल. सर्व रब्बी भाजीपाला, धान्यपिके, गळीतधान्य, कडधान्य, फुल व फळपिके यांच्या नुसत्या आशा पल्लवीत न होता फलद्रुप होतील. विहिरींना पाणी वाढेल. नद्या, नाले, ओढे, धरणे यांना प्रत्येक्षात २२ जून २०१८ पर्यंत चिंता करण्याचे कारण नाही असे वाटते. म्हणून असे म्हणतात की, कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा परवडला, कारण पशुधन व ग्रामीण जनतेच्या पाण्याचा, अस्तित्वाचा, रोजगाराचा, अकाली व मानव निर्मित संकटाशी झगडण्याचा प्रसंग ओल्या दुष्काळाने येत नाही. परंतु त्यापुढे जाऊन आम्ही असे सुचवितो की, अशी अभुतपुर्व पावसाची परिस्थिती व मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू भागातील जनतेवर अशी अनुकूल अवस्था सहसा आली नाही. तेव्हा नंतरच्या सततच्या पावसाने धरणे, तलाव, शेततळे गच्च भरल्याने सर्व फळपिकांना, रब्बी, उन्हाळी पिकांना आवश्यक तेवढे पाणी देता येईल व खरीप वाया गेल्याची भर रब्बी व उन्हाळी हंगामात चतुराईने भरून काढता येईल. तेव्हा त्याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा आणि आपले उत्पादन व उत्पन्नाची सांगड घालावी.