गवारीची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गवार हे शेंगवर्गीय भाजीपीक असून महारष्ट्राच्या सर्व भागामध्ये कमी - अधिक प्रमाणात घेतले जात असून वर्षभर भागणी असते.

ह्या पिकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे राजस्थानरख्या अतिकामी पावसाच्या राज्यामध्ये हे पीक बीजोत्पादनासाठी व्यापारी पीक म्हणून घेतले जात आहे, ज्या ठिकाणी द्राक्ष, डाळींब, बोराच्या बागा अतिशय कमी पाऊसमानामुळे कमी होत आहेत. किंबहुना दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डी. सें. पेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणी गवार बी उत्पादनास भरपूर वाव आहे. राजस्थानचे ४० डी. सें. वरील तापमान हे त्याचे बोलके उदारहण आहे.

सुलभ तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अल्प खर्चिक पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो.

जमीन : हलक्या जमिनीत गवारीचे पीक खुरटे राहते, शेंग लवकर लागते. पण कमी दर्जाचे व उत्पन्न कमी निघते. पोयट्याच्या, गाळाच्या जमिनीत गवार पेरणी किंवा कोकण्याची प्रथा महाराष्ट्रात व देशभर प्रचलित आहे. गाळ सुपीक असल्यास खताची जरुरी भासत नाही व उत्पन्नही चांगले मिळते. भारी जमिनीत गवार हमखास चांगली येते.

हवामान व लागवडीचा मोसम : थंडीत गवारीची वाढ होत नाही व शेंग लागण्यास उशीर लागतो. तसेच माव्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. यासाठी सप्तामृत औषधांचा वापर केल्यास वरील समस्येवर मात करता येऊन थंडीत गवारीचे पीक अधिक, दर्जेदार मिळून भाव १५ ते २५% अधिक मिळू शकतो व जेथे जगभर अनिवासी भारतीय अधिक आहेत अशा देशात निर्यातीस वाव आहे.

लागवड: भाजी पीक म्हणून गवार करण्यासाठी लागवड फोकून, पेरून, टोकून या तीन पद्धतीने करता येते.

१) फोकून : गाळाच्या जमिनीमध्ये, धरणाजवळच्या जमिनीत जेथे पोयटा अधिक असतो त्या ठिकाणी, पाणथळ भागात जेथे पाभर चालत नाही तेथे गवार फोकून करतात बी साधारण एकरी ७ ते १२ किलो वापरावे व अंतर साधारण दाट असून ९ इंचाच्या आसपास ठेवावे.

२) पेरणी : सपाट, निचरा योग्य जमिनीमध्ये सलग पीक करावयाचे असल्यास पाभरीने गवारीचे बी दीड फूट अंतरावर पेरले जाते. अंतर साधारणपाने नऊ इंच ठेवले जाते. देशी गवार याहून दाट पेरली तरी चालते. एकरी ६ ते ७ किलो बियाणे पुरेसे होते.

३) टोकून : मिश्र पीक करावयाचे झाल्यास किंवा पाणी कमी असल्यास दीड फुट सरीवर ९ इच अंतरावर हे पीक टोकून केले जाते. यामुळे एकरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे होते.

जाती :-

१) सुरती गवार : झाडास फांद्या अधिक असतात. ऑक्टोबरनंतर व उन्हाळ्यात घेतली जात असून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालते. शेंग जास्त पातळ, लांब, जाडसर व फताडी असून अधिक गुळचट व उभी लव असते. गुच्छ लागत नाहीत.

२) पुसा सदाबहार : शेंग गुच्छाने लागत असून बारीक, लांब, लवरहित सडसडीत कोवळी व गोड चवीची असते. शेंगा खालपासून वरपर्यंत लागत असल्याने तोडणीसाठी चांगली व सोपी जात आहे. ही शहरी भागात अधिक प्रचलित आहे. म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी व निर्यातीसाठी योग्य होय.

३) देशी (गावरान ) गवार : पुसा जातीचे शोध लागणे अगोदर ४० वर्षापूर्वी गावोगाव देशी गवारीचे बी प्रचलित होते. ही गवार आखूड, निबर, बीजयुक्त, केसाळ खाजविणारी परंतु चविष्ट असून खेडेगावांमध्ये चवीने खाल्ली जाते. विशेषत : सोलापूरसारख्या जिल्ह्यामधील खेड्यात व शहरात या गवारीला खूप मागणी असल्याने १५ ते २५ रुपये किलो सरासरी भाव सहज मिळतो.

बीजप्रक्रिया :- २० मिली जर्मिनेटर + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + अर्धा लिटर पाणी यामध्ये १ किलो बी ४ तास भिजवून सावलीत सुकवून पेरावे अथवा टोकावे.

बियाण्याची उगवण व प्रक्रिया : गवारीचे बियाची उगवण फार विचित्र आहे. सर्वसाधारणपणे अनेक प्रकारच्या बियांना वाफसा आल्यावर तरी पेरावे लागते किंवा लगेच पाणी दिले तरी झपाट्याने उगवण होते. तथापि गवार लागवड करताना बी कोरड्या जमितनीत टाकावे लागते व ३ ते ४ दिवस जमिनीत तापू द्यावे नंतर पाणी द्यावे.

थंडीमध्ये बियाणे उगवत नाही यासाठी सर्व प्रकारचे बियाणे कोमट पाण्यामध्ये जर्मिनेटरचे द्रावण तयार करून त्यामध्ये भिजवून सुकवून मगच लावावे, म्हणजे उगवण अप्रतिम होऊन गवारीवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

खते : सर्वसाधारणपणे गाळाची जमीन असताना कोणत्याही खताची गरज नाही. वरकस किंवा काळ्या जमिनीमध्ये एकरी ६० ते १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत पुरेसे होते. बी उगवून आल्यानंतर एकवीस ते तीस दिवसांनी साधारण ४० ते ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत महिन्याचे अंतरांनी दोनदा द्यावे. युरिया शक्यतो देवू नये, कारण युरिया दिल्यामुळे पाने रसरशीत, अधिक हरितद्रव्ययुक्त मऊ असल्याने भुरी रोग व मावा किडीस लवकर बळी पडते.

पाणी : उगवण झाल्यानंतर साधारण थंडीमध्ये दर ८ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यामध्ये पाणी सकाळी ९ ते ५ य दरम्यान द्यावे. तोडणीचे अगोदर दोन दिवस पाणी द्यावे. म्हणजे वजन वाढते. माल टवटवीत राहतो. शेंगा लागल्यानंतर पाचव्या दिवशी पाण्याचा ताण बसल्यास शेंगाचा दर्जा घसरतो, शेंगा निबर व शुष्क होऊन भाव व वजन दोन्ही घसरतात .

कीड व रोग : गवार पिकामध्ये मावा, तुडतुडे या किडींचा तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. प्रतिबंधक उपया म्हणून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा खालीलप्रमाणे वापर केल्यास गवारीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळून मार्केटला १५ ते २० टक्के अधिक भाव मिळतो.

फवारणी :

१) बी उगवल्यानंतर १० ते १५ दिवसांनी: जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर २५ मिली. + क्रॉंपशाईनर २५ मिली.+ प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २० मिली. + हार्मोनी १० मिली + १० लि.पाणी.

२) २५ ते ३० दिवसांनी : थ्राईवर ३० मिली. + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रिझम २० मिली. + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + हार्मोनी १५ मिली + १० लि.पाणी.

३) ४० ते ४५ दिवसांनी (फुल लागण्याच्या सुमारास ): थ्राईवर ४० मिली. + क्रॉंपशाईनर ४० मिली.+ न्युट्राटोन ३० मिली.+ प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + हार्मोनी १५ मिली + १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन + १० लि.पाणी.

४)तोडे चालू झाल्यानंतर दे १० ते १५ दिवसांनी :- (उत्पादन, दर्जावाढीसाठी ) थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + राईपनर ३० मिली. + न्युट्राटोन ३० मिली.+ + प्रोटेक्टंट ३० ते ४० ग्रॅम + हार्मोनी १५ मिली + १० लि. पाणी.

खोडवा घेण्यासाठी : ५०० मिली जर्मिनेटर + ५०० मिली थ्राईवर + ५०० मिली प्रिझम + १०० लि. पाणी वरीलप्रमाणे औषधांचे प्रमाण घेऊन फवारणी केल्यास गवार या पिकाचा खोडवादेखील घेत येऊन गवार वर्षभर चालवता येते, परंतु २ ते ३ पेक्षा जास्त वेळा खोडवा घेऊ नये. कारण गवारीचे खोड पोकळ असल्याने झाडे मोडण्याची शक्यता असते.

तोडणी : गावारीला फुल साधारण उगवून आल्यानंतर दीड महियांनी लागते. २ महिन्यांनी शेंगा काढण्यासा सुरुवात होऊन आठवड्यातून दोनदा गवार तोडणीस येते. गुच्छ लागणाऱ्या शेंगामध्ये बारीक शेंगाचे प्रमाण अधिक येते. सर्व शेंगा एकाच वेळी तोडणीस येत नसून तयार शेंगांचीच तोडणी करावी लागते. रोजंदारीवर एक बाई ७ ते ८ किलोच शेंगा तोडू शकते. त्यामुळे पावसाळ्यात केलेल्या गवारीचे पैसे होत नाहीत.

उत्पादन : एकरी २.५ ते ३ टन मिळते.

गवार ही भारी काळ्या चिकणमातीयुक्त जमिनीत केली तर ती माजते, खोड जाड होऊन पाने रुंद होतात. खोड लवचिक (ठिसूळ ) बनते. त्यामुळे या गवारील शेंगा लागल्यानंतर त्या आठवड्यातून २ वेळा नियमित तोडाव्यात. इतर कामांमुळे तोडणीला जर उशीर झाला तर झाड अती उंच ( ३ ते ४।। फुट ) व खोड लवचिक असल्याने शेंड्याकडून गवारीचे झाड जमिनीवर लोळते. त्यामुळे गवारीच्या शेंगाचे शेंडे मातीत रोवले जातात आणि शेंगाची प्रत कमी होते. परिणामी गवारीला बाजार कमी मिळतो. त्यासाठी गवार आठवड्यातून २ वेळा तोडल्यावर आणि डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केलेली गवार ही कोवळी, मध्यम ते मोठी आणि शेंगाची वाढ झपाट्याने होते असल्यामुळे आठवड्यातून ३ वेळा तोडावी लागते. सप्तामृत व कल्पतरू तंत्रज्ञानाने केलेली गवार ही कोवळी , मध्यम ते मोठी असते. तोडणी झाल्यानंतर ३ दिवस फ्रिजचे बाहेर राहिली तरी ती जशीच्या तशीच ताजी, चमकदार, हिरवीगार राहते. शेंगा कोवळी, लांब व टवटवीत, लवचिक, चविष्ट असल्याने बाजार भाव इतरांपेक्षा २० ते ३० % जास्त मिळतो. आठवड्यातून ३ वेळा तोडल्याने ५ ते २० किलो जरी माल निघत असेल तरी सर्वसामान्य गरिब शेतकऱ्यांची लहान लहान मुले शाळेतील अभ्यास करून सकाळी २ तास आणि शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी ३ तास गवार तोडून दररोज ५० ते १०० रू. मिळवू शकतील. या पैशातून त्यांना वह्या, पुस्तके तसेच इतर शालेय वस्तू घेत येईल.

जूनपासून ते दिवाळीपर्यंत या गवारीला २० ते ३० रू. किलो किरकोळ भाव मिळतो आणि उन्हाळ्यात याच गवारीला ३० ते ३५ रू. होलसेल भाव मिळतो.

वीर, भाटघर, उजनी धरणामध्ये ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्यानंतर या गाळाच्या जमिनीत पारंपारिकतेने गवारीची पेरणी करतात. या जमिनीतील गवार हि बिगर खताची, कमी पाण्यावर येणारी असून उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते आणि या गवारीपासून कमी खर्चात चांगले पैसे मिळतात.

खडकाळ जमिनीत गवार चांगली येते. ती माजत नाही आणि फुलकळी लवकर लागते. गवार हे कमी पाण्यावर येणारे पिक असल्यामुळे राजस्थानमध्ये गवारीची बीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस असून हे एकमेव पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाचे व्यापारी तत्वावर उत्पादन घेऊन गवारीपासून गम (डिंक) तयार केला जातो व त्याला व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कमी पाणी असलेल्या भागामध्ये गवारीची लागवड करून चांगले पैसे मिळवता येतील असा संदेश देता येतो.