भारतातील हळद पिकविणाऱ्या राज्यांचा आढावा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


हळदीचे शास्त्रीय नाव कुरकुमा लोंगालीन हे आहे. याचे उगमस्थान भारत आणि साऊथ इस्ट आशिया हे आहे. भारत हा हळदीचे अधिक उत्पादन करणारा, वापर करणारा आणि निर्यात करणारा देश आहे. हळद ही पुरातन काळापासून जगाला माहीत होती. हळदीचे कंद हे अतिशय पिवळेधमक ते केशरी रंगाचे असतात. कंदापासून पावडर तयार करून हळद तयार होते. याचा वापर रंगविण्यासाठी, औषधांमध्ये व स्वादामध्ये खिस्तपुर्व ६०० वर्षापासून ज्ञात आहे. भारतीय हळदीतील कुरकुमीन हे ठळक पिवळा रंग असणारे मृदु आणि पिकलेल्या फळासारखा स्वाद असणारा आहे. म्हणून भारतीय हळद ही जगात उत्तम समजली जाते. भारतीय हळद जपान, श्रीलंका, इराण, उत्तर अफ्रिकन देश, अमेरिका, इंग्लंड या राष्ट्रात निर्यात केली जाते. भारतातील हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र हे ४,४९,४१० हेक्टर असून उत्पादन हे ५,२७,९६० टन आहे. या मधील आंध्रप्रदेशातील क्षेत्र सर्वात जास्त ५६,८२० हेक्टर असून येथील उत्पादन २,८३,५४० टन आहे.

तामिळनाडूमधील १७ हजार हेक्टर क्षेत्र असून येथील उत्पादन ६४,५४० टन आहे. पारंपारिक पद्धतीने हळद उत्पादन करणारे आंध्र आणि कर्नाटक राज्य असून येथील उत्पादकता ही साधारण ४,९०० किलो / हेक्टर अशी आहे.

हळदीचा जीवनक्रमाचा काळ हा २१० ते २७० दिवसाचा आहे. २१० दिवसात तयार होणारी हळद ही हळवी समजली जाते. निमगरवी व गरवी हळदीला २४० ते २७० दिवस लागतात. हळदीच्या उत्पादनामध्ये कमाल कमान तापमान तसेच कमाल किमान पर्जन्यमान याचे प्रमाण हे हळदीची उत्पादकता ठरविते.

आंध्रातील जमीन अधिक अनुकूल समजली जाऊन मध्य आणि पश्चिम आंध्र येथील काही प्रमाणातील जमीन ही निरुपयोगी होय. निजामुद्दीन, गुंटुर, नेरोल, विशाखापट्टनम आणि मेडक हे जिल्हे हळद उत्पादक जिल्हे समजले जातात. त्याचबरोबर कर्नुल, मेहबुबनगर व अनंतपूर या जिल्ह्यातही कमी अनुकूल परिस्थिती असुनही हळद लागवडीखालील चांगली क्षेत्र आहे. परंतु एकंदर आंध्रची उत्पादकता घसरती आहे.

या उलट आसामचे क्षेत्र पूर्वीपेक्षा वाढले आहे. तथापि १९८० ते १९८९ पर्यंत ते स्थिरावले होते व १९९० ते १९९५ या कालावधीत उत्पादकतेत घसरण झाली, परंतु १९९५ ते २००० या सालात ६०० ते ८०० किलो / हेक्टर उत्पादकता वाढली आहे. आसाममध्ये हवामान हे हळद लागवडीस अतिशय उपयुक्त समजले जाते. आसाममध्ये कारीबिंगलोंग, कामरूप, नॉवगोंग आणि सनितपूर हे जिल्हे हळद लागवडीस योग्य होत. आसाममधून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. तिला नेहमी प्रचंड पूर येतो. त्यामुळे हळद उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आसाममध्ये नोउगम (Nowgam), हाजो (Hajo), बरहोल जोरहट (Barhola Jorhat) , दादरा गौहाटी (Dadra Gauhati) आणि मारण (Maran) या स्थानिक जाती आहेत.

या जातींचा लागवडीमध्ये प्रभाव असल्याचे कारण म्हणजे येथील हवामान डोंगराळ भागामुळे अनुकूल असते. हळद उत्पादनासाठी सखोल ज्ञान व घ्यावयाची निर्णयशक्ती अतिशय महत्त्वाची ठरते. येथील शेतकऱ्यांना सुधारलेले व्यवस्थापन, चांगले मार्केट, साठविण्याची सुविधा, पाणी देण्याची पद्धत, पिकाची अनुकूलता असण्याचे ज्ञान असल्यामुळे आसामचे उत्पादन चांगले आहे.

तिसरे राज्य म्हणजे बिहार हळदीचे लागवडीस योग्य राज्य आहे. १९७० साली ९००० हेक्टर क्षेत्र हे हळद लागवडीखालील होते. परंतु २००० साली ते २००० हेक्टरने घसरले. १९७५ साली हळदीची उत्पादकता २५०० किलो. हेक्टर होती आणि ती आता १००० ते १५०० किलोवर स्थिरावली आहे. या लागवडीमध्ये स्थानिक जातींचा वापर, व्यापारी मागणीतील आवभाव यामुळे घसरण, निर्यात आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानातील अभाव येथील उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. म्हणून बिहारमधील जनता कोणतेही तंत्रज्ञान न वापरता पारंपारिक पद्धती ने लागवड करते. येथील शेतकऱ्यांनी वातावरण व हवामानाचा अभ्यास जर जाणीवपुर्वक केला तर बिहारमधील उत्पादन हे ढोबळ मनाने चांगले राहील.

केरळ राज्यातील सर्व जिल्हे हळद लागवड करतात. परंतु यातील जमीन ही प्रतिकूल आहे आणि थोडी जी जमीन आहे ती अन्नत जातीचा व आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून येथील उत्पादकता खरे तर कमी आहे. केरळ हे राज्य आयुर्वेदाच्या आणि हळदीचे औषधी उपयोगासाठी, गुणधर्मासाठी अधिक मागणी असलेले राज्य आहे. १९७० साली जे ४,५०० हे. क्षेत्र होते ते १९७५ साली २५०० हे. झाले १९८० साली ते वाढून ३५०० ते ४००० हे. झाले याला कारण म्हणजे भरपूर चुरस, बाजारपेठे तील मागणी व उन्नत जातींची अनुकूलता ही मुख्यत्वे होत.

कर्नाटक ताज्यामध्ये उत्तरे पासून दक्षिणेकडील पट्टा हा हळद लागवडीस अनुकूल आहे. यामध्ये शिमोगा, कामराजनगर, उत्तर कन्नडा, हासन, बेळगाव, मंड्या, म्हैसूर, कोडगू आणि धारवाड हे जिल्हे विशेष करून येतात. तथापि रिचूर, दक्षिण कन्नडा आणि विजापूर हे जिल्हे हळद लागवडीस प्रतिकुल आहेत.

सगळ्यात उत्कृष्ट क्षेत्र हे तामिळनाडूमधील आहे. येथील शेतकरी प्रगत आहेत. मार्केट चांगले आहे. येथील प्रगत शेतकरी असल्याने एकूण लागवड क्षेत्र कमी - अधिक झाले तरी पुरवठा आणि मागणी यामध्ये आघाडी घेतली आहे.

केरळमध्ये १७०० हे. क्षेत्र लागवडीखालील असून येथील उत्पादकता ४,५०० किलो/ हे. आहे.

ओरिसा हे राज्य पारंपारिक उत्पादन घेणारे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील उत्पादकता ही २४०० किलो/ हे. आहे येथील व्यावास्थापनाच्या सुविधा ह्या निकृष्ठ जरी असल्या तरी १०,००० हेक्टरपासून २५,००० हेक्टरपर्यंत क्षेत्रात वाढ झाली आहे व त्याचबरोबर उत्पादकताही वाढली आहे. उत्पादनातील चढ- उतारातील जो फरक आहे तो दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झाला आहे. जर ओरिसाने याकडे जाणीवपुर्वक लक्ष दिले तर ओरिसा राज्य हे आधाडीवरील हळद उत्पादक राज्य होऊ शकते.

महाराष्ट्रातील एकोन लागवडीलील क्षेत्र हे ६,६०० हे असून महराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर येथील क्षेत्र कमी अनुकूल आहे. येथील उत्पादकताही १२३८ किलो / हे. आहे ही फार कमी आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष हे मिरची या व्यापारी पिकाकडे आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जाणीवपुर्वक वापर केल्यास महाराष्ट्रातील हळदीचे उत्पादन वाढू शकते. गेल्या ३-४ वर्षापासून हळदीसारखे अपारंपरीक व्यापारी पीक महाराष्ट्राच्या अनेक भागात अभ्यासपुर्ण शेतकऱ्यांमुळे व सिंचन सुविधा, जबरदस्त महत्वकांक्षा, प्रगतीशिलता व प्रयोगशिलतेची कास धरून अनेक जिल्ह्यात हे सोनेरी पीक म्हणून ओळख निर्माण करत आहे. या संशोधन व विकास गतीमान झाला तर केंद्र सरकार येत्या काही वर्षात FAO च्या मदतीने राष्ट्रीय हळद संशोधन केंद्र निर्माण करू शकते.