अति पावसातील सोयाबीन यशस्वी, इतरांचे पिवळे पडले

श्री. संजय धानोरकर (M.S.E.B. Engi. ),
मु. पो. ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर.
मोबा. ९७६९४८१८५०


मागीलवर्षी नागपूर आणि जळगाव कृषी प्रदर्शन पाहण्यास मी स्वत: गेलो होतो. तेथून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी स्टॉंलवरून तंत्रज्ञानाची माहिती घेतली, तसेच 'कृषीविज्ञान' मासिकाची वर्गणी भरून अंक चालू केला. मासिक अंक आम्हाला नियमित येत असून त्याचे वाचन करून तसा शेतीत प्रयोग करण्यास सुरुवात केली.

चालू वर्षी प्रथम जे.एस. ३३५ वाणाचे सोयाबीन २ हेक्टरमध्ये ४ बॅगा ३० किलोच्या पेरल्या. बियाला पी.एस.बी. आणि रायझोबियम वापरले होते. बी उगवणीनंतर २ महिने सतत पाऊस व आभाळ आलेले असायचे. या काळात पिकाला सुर्यप्रकाश मिळालाच नाही. या २ महिन्यामध्ये नागपूर प्रदर्शनातून नेलेले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर व प्रोटेक्टंट २ वेळा फवारले. एवढ्यावर झाडांची वाढ अति पावसातही समाधानकारक आहे. इतरांचे सोयाबीन दबले. वाढ खुंटली, पिवळे पडले. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला. आपल्या प्लॉटची मात्र वाढ पुर्ण होऊन फुलगळ झाली नाही. बुरशीचा प्रादुर्भाव सुरू होताच कॉपर ऑक्झीक्लोराईड फवारले तर बुरशी जागेवर थांबून आटोक्यात आली.

पाऊस सतत असल्याने सोयाबीनमध्ये डवर (औत) फिरवता आले नाही. त्यामुळे गवत खुपच वाढले होते. शेवटी ते मजुरांच्या सहाय्याने कापून काढले. तर आता सोयाबीनच्या ओळी भरगच्च दिसत आहेत. शेंगा बुंध्यापासून शेंड्यापर्यंत लागल्या आहेत. साधारण दसऱ्याला सोयाबीन काढणीस येईल. तरी अति पावसातही ५ एकरात ४० क्विंटल उत्पादन सहज मिळेल असे वाटते. नेहमीच्या शेतकऱ्यांना तेवढेही मिळणे अवघड आहे.

या अनुभवावरून हरभरा व गव्हासाठी सरांचा सल्ला घेण्यास आज २/१०/१३ रोजी आलो आहे. सोयाबीन काढल्यानंतर ही पिके घेणार आहे.