कलिंगडाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.

अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.

कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणार्‍या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस - पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.

मागील वीस वर्षापासून - लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.

महत्त्व : उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.

कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण : पाणी -९३%, शर्करा पदार्थ - ३.३%, प्रथिने - ०.२%, तंतुमय पदार्थ - ०.२%, खनिजे - ०.३%, चुना - ०.०१%, स्फुरद - ०.०९%, लोह - ०.००८%, जीवनसत्त्व 'क' - ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ब' -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ई' - १ मि. ग्रॅ. असते.

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, केल्शियाम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्य विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. तथापि सप्तामृत फवारल्याने हे फळावरील डाग आले नसल्याचा त्या भागातील शेतकर्‍यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.

१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.

३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.

४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.

५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.

६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :

१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.

२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.

३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.

४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य

नोन्यु कंपनीचे किरण कलिंगड लांबट लहान ते मध्यम आकाराचे असल्याने घेणार्‍यालाही परवडत असल्याने याला वजनावर ८ ते १५ रू. किलो भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहे. याचा गर लालभडक, मधूर गोड चवीचा असल्याने याला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. नामधारी कंपनीच्या २९५, २९६, ४५० या जातींची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी नवीन व चांगल्या वाणांनी नेहमी मागणी करतात. अशा संकरित जातींनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून शेतकर्‍यांनी प्रतिकूल हवामानात भरघोस उत्पादन घेतल्याचे कळविले आहे.

लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरीही त्यास सप्तामृत (जर्मिनेटर,थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन) वापरल्यास प्रतिकूल हवामानात देखील वाढ चांगली झाल्याने अधिक उत्पादन मिळते. त्याचबरोबर दर्जाही सुधारतो त्यामुळे भावदेखील चांगला मिळतो. पंढरपूर, बारामती, जुन्नर भागामध्ये कलिंगडाची लागवड बाराही महिने करतात व ही कलिंगडे आडहंगामामध्ये निर्यातदेखील करतात.

लागवड : लागवड सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड करावी. दोन मीटर अंतरावर सर्‍या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटावर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. पाणी कमी असल्यास १० -१० फुट अंतरावर सरी काढून ४ -४ फुटावर लागवड करावी.

थंडीमध्ये बियांची उगवण कमी होते. वाढ लवकर होत नाही. यासाठी कोमट पाण्यामध्ये 'जर्मिनेटर' ची प्रक्रिया करावी. यासाठी २५० ग्रॅम बियासाठी २५० मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवूननंतर २५ मिली जर्मिनेटर टाकावे. बियाणे जास्त असल्यास १ किलोपर्यंत १ लि. पाणी वरीलप्रमाणे घेऊन जर्मिनेटर २५ ते ३० मिली वापरावे अशा द्रावणात ३ ते ४ तास बी भिजवून सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर व निरोगी होते. मर होत नाही.

बियाणे : साधारणत: शेतकरी एक किलो बी प्रती एकरी वापरतात. परंतु वरील प्रमाणे प्रक्रिया करून एका ठिकाणी एकच बी लावल्यास अर्धा किलोपेक्षा कमी बी एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे होते. संकरित जातींचे एकरी ३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. सरी पाडून बी टोकल्यास वेल पसरावयास जागा राहते. बी टोकताना प्रत्येक हुंडीवर पसभर 'कल्पतरू' सेंदीय खत टाकून बी टोकावे. बी जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्यास आंबवणी, चिंबवणीस उशीर झाला तरी चालते.

बियांची ६ ते ८ दिवसांनी उगवण होते. या संदर्भात बहूळ, ता. राजगुरुनगर येथील प्रगतीशील शेतकर्‍याने असा अनुभव सांगितला आहे की, एरवी कलिंगडाचे बी १० व्या दिवशी उगवते, थंडीत ३ आठवड्यांनी उगवते, परंतु जर्मिनेटर बियांसाठी वापरल्याने उगवण ५ व्या दिवशी झाली. मर वगैरे झाली नाही. वेल वाढू लागल्यानंतर आठ दिवसांनी जर्मिनेटर २० मिली, थ्राईवर ३० मिळू, क्रॉंपशाईनर ३० मिली व एक चमचा प्रोटेक्टंट १० लि. पाण्यातून फवारल्यास वेलींची वाढ चांगली होते. साधारणत: थंडीमध्ये वेली आकसतात, परंतु सप्तामृताचा वापर केल्यास वेलींचा शेंडा व्यवस्थित चालतो.

४० दिवसांनी फूल लागण्यास सुरुवात होऊन ६० दिवसांनी गुंड्या लागणे सुरू होते. शक्यतो एका वेलीवर दोनच फळे ठेवावीत.

पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.

खते : 'कल्पतरू' सेंद्रिय खत एकरी १०० किलो वापरावे. खत देताना ५० -५० किलो कल्पतरू खत २ टप्प्यात द्यावे. सुरुवातीला बी टोकतान आणि नंतर खुरपणीच्या वेळेस पीक १ ते १।। महिन्याचे झाल्यावर बांगडी पद्धतीने द्यावे. रासायनिक खतांचा वापर करावयाचा असल्यास एक महिन्याच्या अंतराने मिश्रखत आळे पद्धतीने प्रत्येकी ३० ग्रॅम द्यावे. फूल लागल्यानंतर ५० ग्रॅम व गाठी/ गुंडी लागल्यानंतर ६० ग्रॅम मिश्रखत द्यावे. फळांच्या गाठी मोठ्या झाल्यानंतर खत देवू नये. कल्पतरू सेंद्रिय खत असल्याने जमीन भुसभुशीत होऊन गारवा वाटतो त्यामुळे वेलीची उन्नग्रहण करण्याची क्रिया सुरळीत होते. त्यामुळे वेलींची वाढ जोमाने होऊन फळांचे पोषण चांगले होते. उन्हाळी कलिंगड पिकला शेणखत, कंपोस्ट खतापेक्षा किंवा सर्व उन्हाळी पिकासाठी कल्पतरू खत हे अतिशय फायदेशीर ठरले असल्याचे शेतकर्‍यांनी आम्हास कळविले आहे.

पीक संरक्षण : (कीड व रोग)

कीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. या किडींना प्रतिबंधक म्हणून प्रोटेक्टंट (आयुर्वेदिक औषध) चा वापर सुरूवातीपासून सप्तामृतमध्ये करावा.

१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.

या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + नुवान १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.

या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + कार्बारिल १५ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.

३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात सुरुवात होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + मेलॅथिऑन (५०%) १० मिली १० लि. पाण्यातून फुले येण्याच्या काळात एकदा व नंतर फलधारणा होताना एकदा फवारावे.

रोग :

१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.

२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.

३) मर : बुरशीजन्य रोग असून वेळी संपूर्ण जळून जातात. यासाठी जर्मिनेटर या औषधाचा वापर बीजप्रक्रियेसाठी केल्यास मर होते नाही.

वरील रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालील फवारण्या घ्याव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १५० ग्रॅम. + प्रिझम २०० मिली. + + हार्मोनी १०० मिली. +१०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ते ३०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी २०० ते २५० मिली, + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी ) : जर्मिनेटर ७५० मिली +थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० ते ६०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + २५० लि.पाणी.

फळांचा आकार, गोडी व रंग येण्यासाठी राईपनरचे प्रमाण वाढवावे. निर्यातीसाठी माल तयार करताना क्रॉंपशाईनर व न्युट्राटोनचे प्रमाण वाढवावे.

विशेष काळजी : फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. यासाठी फळे दोन सर्‍यांच्या उंचवट्यावर ठेवावी किंवा फळाखाली चगाळ (भात, बाजरी, गव्हाचा काड ) ठेवावा. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरल्यामुळे वेलींची वाढ व्यवस्थित व झपाट्याने होऊन फळे लागल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर , बरोबर राईपनर, न्युट्राटोन वापरल्याने फळे चांगली पोसतात. आकार, गोडी व वजन वाढून फळे लवकर व हवी तेव्हा मार्केटला आणता येतात. मोठ्या प्रमाणात भाव मिळून भरपूर नफा मिळतो. अशी उपाययोजना आजपर्यंत अनेक शेतकर्‍यांनी केली असून पुढे दिलेल्या शेतकर्‍यांच्या मुलाखती लक्षात घेण्यासारख्या आहेत.

तोडणी व उत्पादन : साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे ?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.

२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.

३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.

उत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.